
रायगड, 19 मे (हिं.स.) : महाड शहरातील दस्तुरी नाका परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादातून निर्माण झालेला तणाव भीषण मारहाणीत बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 15 जणांच्या टोळक्याने एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना महाड शहर पोलीस ठाणे हद्दीतील पार्क ॲव्हेन्यू रेसिडेन्सी, दस्तुरी नाका येथे घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी, साक्षीदार आणि आरोपी यांच्यात 1 मे रोजी वाहन पार्किंगवरून वाद झाला होता. त्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी पूर्वनियोजित कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेच्या दिवशी फिर्यादी इमारतीबाहेर एकटे असताना आरोपी क्रमांक 1 ते 8 तसेच इतर 10 ते 15 जणांनी त्यांना घेरले. शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांसह काठी, बांबू, झाडू आणि सळईने बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले.
या वेळी फिर्यादीच्या पत्नीने पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप आहे. तिच्या अंगाला हात लावून कपडे ओढण्यात आले तसेच तिच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चैन, एक तोळ्याची बांगडी आणि डायमंड अंगठी हिसकावण्यात आली. तसेच फिर्यादीच्या हातातील रोलेक्स कंपनीचे घड्याळ आणि घरातील रोख 49,230 रुपयेही लंपास करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
हल्ल्यानंतर आरोपींनी “आमची वरपर्यंत पोहोच आहे, आठ दिवसांत संपवून टाकू” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 54/2026 अंतर्गत विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गर्जे करीत आहेत.
---------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)