
लातूर, 19 मे, (हिं.स.)। निलंगा तालुक्यातील खरीप २०२५ पिक विमा भरून जवळपास एक वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना अद्याप विमा रक्कम मिळालेली नाही. तालुक्यातील सर्व महसूल मंडळांना तात्काळ पिक विमा मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, अन्यथा शेतकऱ्यांसह रूमणे हातात घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी दिला आहे.
याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, निलंगा तालुक्यातील सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून खरीप २०२५ चा पिक विमा भरला होता. अतिवृष्टीमुळे लाखो रुपयांचे सोयाबीन पीक नुकसान झाले होते. शासनाने नुकसान भरपाई अनुदान दिले असले तसेच विमा कंपनीने पंचनामेही केले मात्र आजतागायत शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची एक रुपयाचीही रक्कम जमा झालेली नाही. शासनाने संबंधित विमा कंपनीस तात्काळ आदेश देऊन ८ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रा. अण्णासाहेब पंचप्पा मिरगाळे यांनी दिला.
यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख शिवाजी पांढरे, महिला आघाडी तालुकाप्रमुख सविता पांढरे, रंगराव म्हेत्रे, धनराज पाटील, सुलेमान पटेल, सुनील धोंडदेव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis