
राज्यसभा न मिळाल्याची खंत नाही
नाशिक, 13 जून (हिं.स.)
: विधान परिषदेत महायुतीची जी भूमिका आहे, तीच आमच्या पक्षाची भूमिका आहे. सर्व चर्चा झाल्यानंतर युतीचा निर्णय झाला आहे. दराडे आणि भुजबळ वैर त्यात काय? आता युतीचं ठरलं आहे. खोसकर काय बोलले, याची आपल्याला माहिती नसल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
मुंबई नाका भागातील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, नाशिकमध्ये महा युतीने निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी माघार घेतली जात नव्हती, मात्र मुख्यमंत्री यांनी लक्ष घातल्यानंतर मार्ग निघाला. मला राज्यसभेवर जायचे होते. मात्र आमच्या पक्षातील कर्तबगार कार्यकर्त्यांनाही संधी मिळायला हवी. मी राज्यसभेत जावे आणि माझ्या जागी समीर यांना मंत्रीपदाची संधी द्यावी, असे माझे मत होते. वेळ कमी असल्याने ते शक्य झाले नाही. मंत्रिमंडळ फेरबदलात त्याचा विचार व्हावा, अशी माझी अपेक्षा होती. मात्र पक्षाने निर्णय घेतला आणि जैन यांचे नाव निश्चित झाले. समीर यांनी यापूर्वी कोणतीही मागणी केली नव्हती.
राज्यसभा संधी न मिळाल्याबाबत मला कोणतीही खंत नाही. मी शांत आहे आणि पक्षाचे काम करत आहे, असे स्पष्ट केले. पक्ष विलिनीकरणाच्या चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहेत. तुमची सूत्रे कोण आहेत, ते मी शोध घेत आहे. शरद पवार यांच्या भेटीबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, त्यांना भेटण्यासाठी अनेक मोठे नेते जातात. पंतप्रधान मोदी देखील त्यांची भेट घेतात. ते राष्ट्रीय नेते आहेत. मी राज्याचा अध्यक्ष होतो, त्यामुळे त्यांना भेटण्यात काही गैर नाही. लोकशाहीत राजकीय मतभेद असतात, मात्र वैर नसते. 'ऑपरेशन टायगर'बाबत विचारले असता, तुमची सूत्रे तसे सांगत आहेत. त्याबाबत मला माहिती घ्यावी लागेल, असे त्यांनी उत्तर दिले. कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, बाजारात कांदा खरेदी करण्याचा निर्णय झाला असून, राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ स्वतः बाजारात उतरून कांदा खरेदी करत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे जाळे निर्माण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारा वर्षांच्या कार्यकाळाबाबत भुजबळ यांनी कौतुक केले. या काळात भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे जाळे निर्माण केले आहे. देशाच्या विकासासाठी आणि जागतिक पातळीवर भारताची ओळख मजबूत करण्यासाठी मोठे काम झाले आहे, असे म्हटले.
अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईबाबत समाधानी
अन्न व औषध प्रशासनाच्या राज्यभराच्या कारवाईबाबत मंत्री भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले. अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कार्याचा गौरव केला. अन्नातील भेसळ हा अत्यंत गंभीर विषय आहे. विशेषतः दुधातील भेसळ मोठ्या प्रमाणावर आढळते. त्यामुळे मूत्रपिंड आणि इतर आजार वाढत आहेत. अन्नपदार्थ आणि औषधांमधील भेसळीविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. गरज पडल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदाही लागू करावा. यापूर्वीही अशा कारवाया झाल्या आहेत आणि आता देखील त्या सुरू आहेत, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV