
सोलापूर, 15 जून (हिं.स.)।
प्रभागातील नागरिकांना दूषित आणि काळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर नगरसेवक अनंत जाधव यांनी थेट महापालिका आयुक्तांची भेट घेत प्रशासनाला जाब विचारला. यावेळी त्यांनी काळ्या पाण्याने भरलेली बाटली आयुक्तांच्या टेबलवर ठेवत नागरिकांच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले.
प्रभागातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नळातून काळसर आणि दूषित पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक अनंत जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह आयुक्तांची भेट घेत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणाबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी करून दूषित पाण्याचे कारण शोधण्यात येणार असून समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड