
परभणी, 19 जून, (हिं.स.)। पूर्णा तालुक्यातील गौर शिवारात स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने वडार समाजाच्या एका कुटूंबियांसह नातेवाईकांनी मृत्यू पावलेल्या मुलीचा मृतदेह थेट पूर्णा तहसील कार्यालयात आणून अंत्यसंस्कार कुठे करावे, असा सवाल केला.
गौर शिवारात अंत्यसंस्काराकरीता हक्काची स्मशानभूमी नाही. त्यामुळे समाजासमोर सातत्याने अंत्यविधी करावा तरी कुठे? असा प्रश्न सातत्याने उपस्थित राहत आहे, असे नमूद करीत वडार समाजाच्या संतप्त नागरीकांनी शुक्रवार 19 जून रोजी सरस्वती सुरेश पवार या 12 वर्षीय मुलीचा मृतदेह थेट पूर्णा तहसील कार्यालयात आणून ठेवला व मुलीच्या या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे तरी कुठे असा सवाल केला. त्यामुळे कार्यालयांतर्गत अधिकार्यांसह कर्मचार्यांची भांबेरी उडाली. दरम्यान, या समाजबांधवांतर्फे गेल्या कित्येक वर्षांपासून स्वतंत्र स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन द्या, अशी मागणी करण्यात येत आहे. परंतु, प्रशासनाद्वारे कोणतीही ठोस कारवाई होत नाही, असे चित्र आहे. त्यामुळेच संतप्त समाजबांधवांनी आज थेट तहसील कार्यालयात मृतदेह आणून अधिकार्यांना घेरले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis