
सोलापूर, 19 जून (हिं.स.)।
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून सहा खासदार शिंदे गटात गेल्याने मोठा राजकीय भूकंप झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर हे शिंदे गटात गेले आहेत . या घडामोडींनंतर शिवसेना शिंदे गटाकडून “ऑपरेशन टायगर” यशस्वी झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
या राजकीय हालचालींचे सोलापुरात तीव्र पडसाद उमटले. शहरातील सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरातील गणपती घाट येथे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एकत्र येत बंडखोर खासदारांविरोधात घोषणाबाजी करत प्रतीकात्मक दशक्रिया विधी करून निषेध नोंदवला.
आंदोलनापूर्वी शिवसेना (ठाकरे गट) च्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या वेळी बोलताना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले,
“गेल्या 60 वर्षांपासून शिवसेना महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांसाठी आणि हक्कांसाठी सातत्याने कार्यरत आहे. पक्षाची पाळेमुळे अत्यंत घट्ट आहेत. कितीही नेते पक्ष सोडून गेले तरी पक्षाला कोणताही फरक पडणार नाही. निष्ठावंत शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे आहेत.”
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड