
कोल्हापूर, 19 जून, (हिं.स.)। कोल्हापूर जिल्ह्यातील धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही जिल्ह्यात उपसाबंदी केल्याने उभी पीके करपू लागली आहेत, याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन झाले. त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ राठोड यांनी उपसाबंदी तीन दिवसासाठी शिथील करण्याचा निर्णय जाहीर केला. जिल्ह्यातील पाणीसाठ्याची वास्तविक परिस्थिती आणि पिकांचे होत असलेले नुकसान पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पाणी सोडण्याचा निर्णय जाहीर केला.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उद्या, शनिवार पासून तीन दिवसांसाठी शेतीसाठीचा पाणीपुरवठा व उपसा पुर्ववत सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याची माहीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जाहीर करताना सांगितले की, पुढील तीन दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे सुरू राहील. या तीन दिवसांच्या कालावधीनंतर जिल्हा प्रशासन आणि शेतकरी प्रतिनिधींची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील पाणीसाठ्याचा सविस्तर आढावा घेऊन पुढील पाण्याच्या आवर्तनाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी गजानन गुरव, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, जिल्हाध्यक्ष अजित पोवार, राजेंद्र गड्यान्नावर, राजाराम देसाई, धनाजी पाटील, संजय बेले, सचिन शिंदे, विश्वास कोळी, अजित पोवार, राजेंद्र गड्यान्नावर, राजाराम देसाई, धनाजी पाटील, संजय बेले, सचिन शिंदे, विश्वास कोळी, डॉ. बाळासाहेब पाटील, यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar