
लातूर, 26 जून (हिं.स.) :अहमदपूर तालुक्यातील धानौरा पाटी–चाकूर मार्गावरील जढाळा गावाजवळ झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश सदाशिव जाधव (वय 37, व्यवसाय – शेती, रा. टाकळगाव, ता. अहमदपूर) हे आपल्या एमएच 26 बीजी 1018 क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना भरधाव व निष्काळजी वाहनचालनामुळे त्यांनी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, अपघातावेळी मृत व्यक्तीने हेल्मेट परिधान केले नव्हते. डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे जीवितहानी झाली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 195/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis