
पुणे, 04 जून (हिं.स.)। राज्यात तेलबिया पिकांचे उत्पादन वाढवून खाद्यतेल आयात कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs) व सहकारी संस्थांची ‘मूल्य साखळी भागीदार’ (VCP) म्हणून निवड करण्यात येणार आहे.
सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल पिकांमध्ये कार्यरत असलेल्या पात्र शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ जून २०२६ आहे.
या योजनेद्वारे तेलबिया उत्पादन वाढीसाठी तांत्रिक सहाय्य, शेतकरी प्रशिक्षण, प्रमाणित बियाणे वितरण, कृषी मॅपरवर शेतकरी नोंदणी तसेच बाजारपेठ जोडणीसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
पात्र संस्थांनी कंपनी किंवा सहकारी कायद्यांतर्गत नोंदणीकृत असणे, किमान तीन वर्षांचा अनुभव, २०० पेक्षा अधिक शेतकरी सभासद आणि मागील तीन वर्षांची सरासरी वार्षिक उलाढाल ९ लाख रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील पात्र संस्था व कंपन्यांनी आपले प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु