
अकोला, 01 जुलै (हिं.स.)।
माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे जनक कृषिरत्न कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद येथे कृषी विभागाच्या वतीने कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी तसेच पीक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अनय नावंदर यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने मातीपूजन करण्यात आले. भूमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करत कृषिरत्न कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अनय नावंदर होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात त्यांनी शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगत बदलत्या हवामानाचा विचार करून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय व नैसर्गिक शेती, मृदापरीक्षण, जलसंधारण, पीक विविधीकरण आणि मूल्यवर्धित शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. शासनाच्या कृषी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी माया शिर्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाडवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यावेत्ता (विस्तार) डॉ. प्रकाश घाटोळ यांनीही उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आधुनिक शेती, हवामान बदल, मृदा आरोग्य, जलव्यवस्थापन, सेंद्रिय शेती आणि शासकीय योजनांचा लाभ याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी सविता उद्धवराव महल्ले आणि प्रल्हाद नथ्थुजी नेमाडे यांनी आपल्या यशस्वी शेती प्रयोगांचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. त्यांच्या अनुभवांमुळे उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेतीबाबत प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी केले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी (कृषी) रोहित भेयर यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा कृषी अधिकारी (विस्तार) मिलिंद जंजाळ यांनी मानले.
यावेळी जिल्ह्यातील २१ प्रगतशील शेतकरी व पीक स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेचे विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ आणि मोठ्या संख्येने शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होते.
सविता उद्धवराव महल्ले, किशोर जगदेवराव बंड, ॲड. सुभाष हेडा, शरद जानेदेवराव नहाटे, सागर श्रीराम भालतीलक, पंकज विनोदराव मानकर, मदन माधवराव इंगळे, रामेश्वर लालाभाऊ उंडाळ, श्रीमती उषाताई देशमुख, अनिल मोहन राजूर, मंगेश राजाराम डाबोरे, सुनील मारोतराव भारटे, विजय रामभाऊ गुल्हाने, प्रल्हाद नथ्थुजी नेमाडे, अमोल देवराव नवकमंडे, संतोष हरिभाऊ अवताडे, जयेश चंद्रशेखर बोहरा तसेच पीक स्पर्धा विजेते शिवशंकर मधुकर पिसे, हरिचंद्र भगवानजी वके, प्रकाश वासुदेव कोरडे आणि संतोष दयाराम धुमाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कृषी दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या कष्टांचा सन्मान करत आधुनिक, शाश्वत आणि तंत्रज्ञानाधारित शेतीचा संदेश जिल्हाभर पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न जिल्हा परिषद अकोला व कृषी विभागाने केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोहिम अधिकारी महेंद्रकुमार सालके, जिल्हा कृषी अधिकारी सुनंदा दळवी, जिल्हा कृषी अधिकारी (विस्तार) मिलिंद जंजाळ, सहाय्यक प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटोकार, सहाय्यक लेखा अधिकारी अनिल अंभोरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी गजानन नांदे, ग्रामपंचायत अधिकारी संजय गवई, श्री. पंकज जगताप व संजय गवळी, वरिष्ठ सहाय्यक राजू वानखडे, नितीन भुरे, संजय टोंबे तसेच कनिष्ठ सहाय्यक विकास नागरे, प्रशांत हुसे, प्रांजली पांडे, वैशाली काळे, परिचर सुनील गोपनारायण, धनश्याम मेंढे आणि कविता चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कृषी विभागातील उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्याची दखल घेत कृषी विस्तार अधिकारी रोहिदास भोयर तसेच ग्रामपंचायत अधिकारी संजय गवळी आणि संजय गवई यांचा सत्कार करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे