
नवी दिल्ली , 01 जुलै (हिं.स.)। भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी थायलंडसोबतच्या संयुक्त नौदल सरावात सहभाग घेतला. थायलंडमधील सत्ताहिप बंदराच्या दौऱ्यानंतर या युद्धनौकांनी रॉयल थाई नेव्हीच्या एचटीएमएस चाओ फ्राया या युद्धनौकेसोबत पॅसेक्स (पासिंग एक्सरसाइज) हा संयुक्त सराव केला. समुद्रात मित्रदेशांच्या नौदलाच्या युद्धनौका एकमेकांना भेटल्यानंतर आयोजित केला जाणारा हा विशेष नौदल सराव असतो.
भारतीय नौदलाने सोशल मीडिया मंच ‘एक्स’ वर दिलेल्या माहितीनुसार, “पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती यांनी थायलंडच्या सत्ताहिप बंदराच्या भेटीनंतर रॉयल थाई नेव्हीच्या एचटीएमएस चाओ फ्राया या युद्धनौकेसोबत पॅसेक्स सराव केला. या सरावामुळे दोन्ही नौदलांमधील समन्वय आणि संयुक्त मोहिमांची क्षमता अधिक मजबूत झाली असून, सागरी सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्याबाबतची दोन्ही देशांची समान बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली.”
यापूर्वी २८ जून रोजी भारतीय नौदलाच्या या तीनही युद्धनौका त्यांच्या नियोजित ऑपरेशनल तैनातीचा भाग म्हणून थायलंडमधील सत्ताहिप येथे पोहोचल्या होत्या. पूर्व ताफ्याचे ध्वजाधिकारी रिअर अॅडमिरल आलोक आनंद यांच्या नेतृत्वाखाली या युद्धनौकांचे रॉयल थाई नेव्हीकडून औपचारिक स्वागत करण्यात आले.
अधिकृत निवेदनानुसार, हा बंदर दौरा दक्षिण-पूर्व आशियाई देशांसोबत भारताच्या सागरी सहकार्याचा महत्त्वाचा भाग असून, भारत-थायलंडमधील दीर्घकालीन सागरी संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नौदलांमध्ये व्यावसायिक चर्चा, क्रॉस-डेक भेटी, कार्यात्मक संवाद, क्रीडा स्पर्धा आणि सामुदायिक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामुळे नौदल-ते-नौदल सहकार्य आणि संयुक्त कार्यक्षमतेला आणखी बळ मिळणार आहे.
अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, या भेटीचा मुख्य उद्देश भारत आणि थायलंडमधील परस्पर सहकार्य, मैत्री आणि द्विपक्षीय सागरी संबंध अधिक दृढ करणे हा आहे. तसेच, भारतीय नौदलाच्या स्वदेशी रचनेच्या युद्धनौका, मॉड्युलर बांधणी क्षमता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करून संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला विश्वासार्ह भागीदार म्हणून अधोरेखित करणे हाही या दौऱ्याचा महत्त्वाचा हेतू आहे.
भारतीय नौदलाने फेसबुकवरही पोस्ट करत म्हटले आहे, “रिअर अॅडमिरल आलोक आनंद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौका सत्ताहिप येथे दाखल झाल्या आहेत. या दौऱ्याचा उद्देश रॉयल थाई नेव्हीसोबत कार्यात्मक उपक्रम, क्रीडा स्पर्धा आणि सामुदायिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संयुक्त कार्यक्षमता वाढवणे, व्यावसायिक सहकार्य अधिक मजबूत करणे आणि परस्पर समज वाढवणे हा आहे.”
नौदलाने पुढे म्हटले आहे की, हा दौरा भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरण, ‘महासागर’ दृष्टिकोन आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातील सहकार्यपूर्ण सागरी सुरक्षेबाबतच्या भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. तसेच, आसियान-भारत सागरी सहकार्य वर्ष २०२६ अंतर्गत आसियान सदस्य राष्ट्रांसोबत सागरी भागीदारी अधिक मजबूत करण्याचाही या दौऱ्याचा उद्देश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode