
मुंबई, १ जुलै (हिं.स.) : शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत आमदार सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानतंर, आज त्यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. सत्ताधारी पक्षाकडून सचिन अहिर यांचा प्रस्ताव तर महाविकास आघाडीकडून ज.मो. अभ्यंकर यांचा प्रस्ताव निवडणुकीसाठी आला आहे. मात्र, सभागृहाची इच्छा आहे सर्वानुमते निवड व्हावी. त्यामुळे आम्ही आमचा प्रस्ताव मागे घेत आहोत, असे शिवसेना (उबाठा) आमदार अनिल परब यांनी म्हटले. त्यानंतर, सचिन अहिर यांची उपसभापती बिनविरोध निवड झाली. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
ज.मो. अभ्यंकर यांचा प्रस्ताव आम्ही मागे घेत आहोत असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांनी सचिन अहिर यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला, विक्रम काळे यांनी अनुमोदन दिले. भाजपकडून प्रवीण दरेकर यांनी प्रस्ताव मांडला, त्याला धैर्यशील कदम यांनी अनुमोदन दिलं, शिवसेनेकडून मनीषा कायंदे यांनी प्रस्ताव मांडला त्याला रविंद्र फाटक यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर, बहुमताने हा प्रस्ताव मंजूर झाला आणि आमदार सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली.
सचिन अहिर यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या राजकीय प्रवासाची माहिती देत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कौतुक केले. या निमित्ताने विरोधी पक्षाचे देखील आभार मानतो त्यांनी देखील सभागृहाचा मान राखून प्रस्ताव मागे घेतला. 1999 साली मी आणि सचिन अहिर सोबत निवडून आलो होतो. अहिर या शब्दाचा अर्थ गोपालक आणि निर्भीड असा आहे. मला त्यांच्याबाबत अनुभव आहे, ते निर्भीडपणे काम करणारे व्यक्ती आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन अहिर यांचे कौतुक करत अहिर शब्दाचा अर्थ देखील सांगितला.
उपासभापतीपदाच्या खुर्चीवर बसल्यावर प्रत्येकाला न्याय द्यायचा असतो. सचिन अहिर ती कामं करतील. आतापर्यंत उपसभापती म्हणून ज्यांनी काम केलं त्या निलम गोऱ्हे यांचे देखील अभिनंदन करतो. प्रसंगी कठोर भूमिका घेणाऱ्या त्या आहेत. मधल्या काळात संघर्षाचा काळ होता, त्यावेळी देखील त्यांनी चांगलं काम केलं. सचिन अहिर यांची कारकीर्द म्हणजे चळवळीतून तयार झालेला कार्यकर्ता अशी ओळख आहे. मिल मजदूर संघाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलं आहे. 1999 साली विधानसभेत आमदार झाले. त्यानंतर 3 वेळा निवडून आले. 2009 साली राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. समर्पक उत्तर देणारा मंत्री म्हणून सचिन भाऊंची ओळख होती. महत्त्वाचा प्रश्न आला की काय अपेक्षा आहे, असं देखील म्हणायचे, अशी आठवणही देवेंद्र फडणवीसांनी करुन दिली. सचिन अहिर यांची दहीहंडी विशेष चर्चेत असायची. सामाजिक क्षेत्रात चांगलं काम आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात ते हुशार आहेत. ज्यावेळी सभागृहात ते आले त्यावेळी ते धनुष्यबाण चिन्हावर आले. त्यामुळे बदल असा काही घडला नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी