
- युवकांनी जिल्ह्याबाहेरील संधींचाही स्वीकार करावा – जिल्हाधिकारी
हिंगोली, 15 जुलै (हिं.स.)।
रोजगाराच्या संधी केवळ आपल्या गावात किंवा जिल्ह्यातच मिळतील, अशी अपेक्षा न ठेवता ज्या ठिकाणी अधिक चांगल्या संधी उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी जाण्याची तयारी युवकांनी ठेवली पाहिजे. गरज भासल्यास घराबाहेर किंवा जिल्ह्याबाहेर जाऊन काम करण्यास संकोच करू नये. अशा अनुभवातून कौशल्य, आत्मविश्वास, आर्थिक स्वावलंबन आणि उज्ज्वल करिअर घडते. युवकांनी उपलब्ध प्रत्येक संधीचा लाभ घेत स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाच्या प्रगतीतही योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नांदेड विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार यशवंत कलेपवार, विद्यापीठाच्या ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखेचे संचालक प्रा. कैलास मोरे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे तसेच विविध उद्योगसमूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या रोजगार मेळाव्यास जिल्ह्यातील युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्रातील 20 हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेत विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. जिल्हाभरातून सुमारे 300 युवक-युवतींनी सहभाग नोंदविला. दिवसभर झालेल्या मुलाखतींनंतर 225 उमेदवारांना प्राथमिक नोकरीच्या ऑफर्स देण्यात आल्या. यापैकी बहुतांश रोजगाराच्या संधी छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये उपलब्ध झाल्या.
करिअरसाठी आपल्या मूळ गावाबाहेर जाणे म्हणजे गावाशी किंवा मातृभूमीशी असलेले नाते तुटणे नव्हे. आपण कुठेही कार्यरत असलो तरी आपल्या कुटुंबाशी, गावाशी आणि जिल्ह्याशी कायम जोडलेले राहू शकतो. बाहेर मिळालेला अनुभव, कौशल्य आणि प्रगती भविष्यात आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठीही उपयुक्त ठरते. त्यामुळे युवकांनी मोठी स्वप्ने पाहून उपलब्ध संधींचा स्वीकार करावा आणि गरज भासल्यास मोठ्या औद्योगिक शहरांमध्ये जाऊन काम करण्यास मागेपुढे पाहू नये, असे आवाहन संजय काटकर यांनी मार्गदर्शन करताना केले.
यावेळी श्री. काटकर यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या पुढाकारातून हिंगोली येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कौशल्य विकास व उद्योजकता केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा केली. या केंद्रामुळे जिल्ह्यातील युवकांना उच्च शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षणाच्या संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या घोषणेला दुजोरा देत प्रा. कैलास मोरे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासोबत कौशल्य शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच उद्योगाभिमुख कौशल्ये आत्मसात करून रोजगार किंवा स्वयंरोजगारासाठी सक्षम होतात. हिंगोली येथे प्रस्तावित कौशल्य विकास व उद्योजकता केंद्रामुळे जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम, कौशल्य प्रशिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या संधी अधिक सुलभ होतील, असे सांगितले.
हिंगोली जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही अशा रोजगार मेळाव्यांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल. जिल्हा प्रशासन, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, उद्योग क्षेत्र आणि विविध संस्थांच्या सहकार्याने युवकांना रोजगार, कौशल्य विकास आणि करिअर मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी युवाशक्ती फाउंडेशन कटिबद्ध असल्याचे युवाशक्ती फाउंडेशनचे प्रतिनिधी श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.
मेळाव्यात सहभागी झालेल्या युवकांनी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून मुलाखती दिल्या तसेच रोजगार, करिअर आणि कौशल्य विकासाबाबत सविस्तर मार्गदर्शनाचा लाभ घेतला. जिल्हा प्रशासन, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित हा रोजगार मेळावा हिंगोली जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहाशी जोडणारा आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
****
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis