
छत्रपती संभाजीनगर, 23 जुलै (हिं.स.)। सत्ताधारी भाजपने केंद्रीय यंत्रणा आणि अधिकारी यांचा वापर करून अनेक राज्यात सरकारे पाडली. यानंतर खासदार फोडून अनेक पक्ष संपविण्याचा डाव आखला. यावर न थांबता पेपर फोडून विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद केले. यानंतर सत्तेचा गैरवापर करून देवालाही सोडले नाही. भावनेचा बाजार मांडून दागदागिने आणि पैसे चोरले. अनेक कुरापती समोर आल्या. पंतप्रधान पदावरून अंतर्गत वाद सुरू आहे. घोटाळ्यांनी आणि अनेक मुद्यावर सरकारचे पितळ उघडे पडल्याने सत्ताधारी बेचैन झाल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.
सिल्लोड येथे राम मंदिरात शिवसेनेचे रामरक्षा आंदोलनात त्यांनी सत्ताधारी भाजपाला लक्ष केले. अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या देणगी अपहाराचा चौकशी व्हावी, यासाठी शिवसेनेने राज्यव्यापी रामरक्षा आंदोलन सुरू केले. यानिमित्त सिल्लोड मारुती मंदिरात रामरक्षा, भीमरूपी स्तोत्र, हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना उपनेते सुभाष पाटील, जिल्हासंघटक तथा माजी महापौर सुदाम सोनवणे, शिक्षक सेनेचे पद्माकर इंगळे, उपजिल्हाप्रमुख विठ्ठल बदर, तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, संजय कलात्रे, मच्छिंद्र घाडगे, रामेश्वर काळे, शिल्पा गौर, दशरथ सुरडकर, उपशहरप्रमुख सुरेश कर्डिले, विजू सूर्यवंशी, गजानन जैस्वाल, रामेश्वर एंडोले आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis