कोलंबो कसोटीत सारंश जैनला टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता
कोलंबो, 22 ऑगस्ट (हिं.स.) । भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना रविवारपासून कोलंबो येथे खेळला जाईल. भारतीय संघाने गॉल कसोटीत मोठा विजय नोंदवला असून, मालिका आपल्या नावावर करण्यासाठी हा सामनाही जिंकण्याचा त्यांचा
सारांश जैन


कोलंबो, 22 ऑगस्ट (हिं.स.) । भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना रविवारपासून कोलंबो येथे खेळला जाईल. भारतीय संघाने गॉल कसोटीत मोठा विजय नोंदवला असून, मालिका आपल्या नावावर करण्यासाठी हा सामनाही जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या सामन्यात भारतीय संघात एक बदल होण्याची शक्यता आहे. सारांश जैनला पदार्पणाची संधी मिळू शकते, पण संघ व्यवस्थापनाला मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला वगळावे लागू शकते.

भारताने ही मालिका २-० ने जिंकली, तर तो ५७.५८ टक्के गुणांसह जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचू शकतो. तथापि, हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा बांगलादेश ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी कसोटी गमावेल. डार्विनमधील पहिल्या कसोटीत ऐतिहासिक विजय नोंदवणारा बांगलादेश सध्या चौथ्या स्थानावर आहे.

या सामन्यात गिल आणि जैस्वाल यांच्याकडून मोठ्या खेळीची भारताला अपेक्षा असेल. गिल चांगल्या फॉर्ममध्ये असून, त्याने आपल्या शेवटच्या सहा डावांमध्ये दोन शतके झळकावली आहेत. तथापि, मागील सामन्यात त्याची फलंदाजीची कामगिरी खराब होती. कर्णधारपद स्वीकारल्यापासून गिलने १० कसोटी सामन्यांमध्ये ७३ पेक्षा जास्त सरासरीने १,१०० धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून परदेशात आपली पहिली कसोटी मालिका जिंकण्यासाठी तो कटिबद्ध असेल.

जैस्वालची समस्या अधिक गंभीर आहे. गेल्या वर्षी नवी दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावल्यानंतर, या सलामीवीराने आपल्या शेवटच्या आठ डावांमध्ये फक्त एक अर्धशतक झळकावले आहे. वेगवान गोलंदाजांविरुद्ध कट किंवा चिप शॉट खेळताना जैस्वाल बाद होत आहे, ही चिंतेची बाब आहे. गॉलमधील पहिल्या डावात धावबाद झाल्यानंतर, दुसऱ्या डावातही जैस्वाल त्याच प्रकारे बाद झाला. आपल्या खेळाचा हा पैलू सुधारण्यासाठी या डावखुऱ्या फलंदाजाने एसएससी येथे नेट्समध्ये बराच वेळ घालवला. भारताचे वेगवान गोलंदाज आणि गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल यांनी जैस्वालला कट किंवा चिप शॉट खेळण्यास प्रवृत्त करण्याच्या आशेने ऑफ-स्टंपच्या बाहेरील रेषेवर गोलंदाजी केली.

कोलंबो कसोटीत कुलदीप यादवला अंतिम ११ मध्ये स्थान मिळते की नाही याकडे सर्वांचे लक्ष असेल. पहिल्या सामन्यात खेळपट्टीने चांगला पाठिंबा दिला असूनही, त्याने दोन डावांमध्ये २५ षटकांत केवळ एकच बळी घेतला. पहिल्या कसोटीत कुलदीप सर्वात महागडा गोलंदाज ठरला, त्याने प्रति षटक चारपेक्षा जास्त धावा दिल्या. श्रीलंकेच्या संघात डावखुऱ्या फलंदाजांची संख्या जास्त असल्याने, ऑफ-स्पिनर सारांश जैनला पदार्पणाची संधी मिळू शकते.

मात्र, केवळ एका सामन्यानंतर एका वरिष्ठ गोलंदाजाला संघातून वगळणे हा एक चुकीचा संदेश देऊ शकतो. कुलदीप सराव सत्रात सहभागी झाला नाही, त्यामुळे त्याला अंतिम ११ क्रिेकेटपटूंमध्ये स्थान मिळणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण, अंतिम निर्णय मोठ्या प्रमाणावर कोलंबोच्या खेळपट्टीवर अवलंबून आहे, जिची पकड कायम ठेवण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पाणी दिले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande