
प्रवेश विनामुल्य ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
नाशिक, 26 ऑगस्ट, (हिं.स.)। नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण झाली असून, २८ ते ३० ऑगस्टदरम्यान ठक्कर डोम येथे भक्ती, संगीत आणि भारतीय सांस्कृतिक परंपरांचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. प्रवेश विनामूल्य असून तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नाही. नाशिककर भाविक, विद्यार्थी व सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत केले.
उद्घाटनानंतर सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन, तर रात्री ८ ते १० या वेळेत राहुल देशपांडे यांचा ‘अभंगवारी’ कार्यक्रम होईल.२९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ आणि दुपारी २ ते ४ या वेळेत ‘भक्ती संमेलन’ होणार आहे. ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : भारतीय संत आणि समरसता’ या विषयावरील पहिल्या सत्राचे समन्वयक पराग महाराज चातुर्मासे असून, शिवाजी महाराज मोरे, डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी, महंत श्रीमानस शास्त्री, सुदर्शन महाराज कपाटे, सुप्रिया साठे आणि प्रमोद महाराज जगताप सहभागी होतील.
राष्ट्रीयदृष्ट्या संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय’ या विषयावरील दुसऱ्या सत्राचे समन्वयक डॉ. सदानंद मोरे असतील. श्री राणा महाराज वासकर, डॉ. द्वाराचार्य, महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर, जनार्दन हरिजी महाराज, रामकृष्ण महाराज वीर, मंदार बुवा रामदासी आणि महंत श्री. चिरडे बाबा सहभागी होतील. सायंकाळी डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांचे कीर्तन आणि रात्री कु. मैथिली ठाकूर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल.
दि. ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ८ या वेळेत श्री दरबार साहिब, अमृतसर येथील भाई मनिंदर सिंह हजुरी रागी यांचे गुरबाणी शबद कीर्तन होईल. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मणिपूरच्या नट संकीर्तन महाजेग्याचे सादरीकरण, तर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होईल. ‘कुंभ भक्ती संगम’ हा नाशिककर आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी भक्ती, संगीत व विविध भारतीय परंपरांचा अनुभव घेण्याची संधी आहे. नागरिकांनी कुटुंबीय व मित्रपरिवारासह उपस्थित राहावे, असेही सिंह यांनी सांगितले. शबद कीर्तनावेळी भाविकांनी अध्यात्मिक भाव जपण्यासाठी शिर झाकून ठेवावे. तसेच कार्यक्रमाचे पावित्र्य, स्वच्छता व शिस्त कायम राखण्यासाठी गुटखा, पान, बिडी, सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI