विठ्ठल मंदिर २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान दर्शनासाठी बंद
सोलापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मूर्तींच्या संवर्धनाचे काम २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. या कालावधीत मंदिर भाविकांसाठी दर्शनास बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच
Vithal


सोलापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)।

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मूर्तींच्या संवर्धनाचे काम २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. या कालावधीत मंदिर भाविकांसाठी दर्शनास बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या संवर्धनाबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला.

विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या पायाची झीज झाल्याचे काही महिन्यांपूर्वी निदर्शनास आले होते. त्यानंतर मंदिर समितीने या विषयावर विधी व न्याय विभागाकडून अभिप्राय मागविला होता. शासनाच्या सूचनेनुसार आता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (ASI) तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखाली मूर्ती संवर्धनाचे काम करण्यात येणार आहे.

मूर्तींचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन संवर्धनाची प्रक्रिया तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहे. या कामासाठी २३ ते २५ सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

त्यामुळे या कालावधीत पंढरपूरला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी नियोजन करताना मंदिर बंद राहणार असल्याची नोंद घ्यावी, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande