
लातूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर तालुक्यातील रामेश्वर परिसरात उभारण्यात आलेल्या संत श्री गोपाळबुवा महाराज शुगर अँड ॲग्रो फुड इंडस्ट्रीज प्रा. लि. या साखर कारखान्याचा दुसरा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. यावर्षी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा साधेपणाने करण्यात आला. येत्या ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी गळीतृ होते हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक केली जाईल, अशी ग्वाही कारखान्याचे चेअरमन राजेश कराड यांनी दिली.
कारखान्याचे प्रवर्तक तुळशीराम अण्णा कराड, प्रगतशील शेतकरी काशीरामनाना कराड, कौशल्या कराड, चेअरमन राजेश कराड, शुभांगी कराड, रणविर कराड, देव कराड यांच्यासह मान्यवरांच्या शुभहस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. तत्पूर्वी बालासाहेबतात्या कराड आणि आशाताई कराड यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी कारखान्याचे भागधारक, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी राजेश कराड यांनी सांगितले की, मागील वर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्याने कारखान्याने १ लाख ३५ हजार टन उसाचे गाळप केले. यंदाच्या गळीत हंगामाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून ११ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष गाळप सुरू करण्यात येणार आहे.
यंदाच्या हंगामासाठी ऊस दराबाबत माहिती देताना कराड म्हणाले की, ११ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यानच्या उसाला प्रतिटन ३१५१ रुपये, १ डिसेंबर ते १५ जानेवारीदरम्यानच्या उसाला ३२५१ रुपये, तर १५ जानेवारीनंतर येणाऱ्या उसाला ३३५१ रुपये दर देण्यात येणार आहे. या दराची पहिली उचल २८०० रुपये असून उर्वरित रक्कम दोन टप्प्यांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गाळपासाठी आलेल्या उसाचे पेमेंट विश्वकल्याण नागरी सहकारी संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विश्वकल्याण पतसंस्थेच्या माध्यमातून यावर्षी फोन पे, नगदी रक्कम वितरणासह सुरक्षा ठेव व कर्जवाटपाची सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जाहीर केलेल्या दरात निश्चितपणे वाढ होईल; मात्र दर कमी केला जाणार नाही, अशी ग्वाही देत राजेश कराड यांनी शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे सांगितले. कमी कालावधीत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी कारखान्याची उभारणी करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी होणाऱ्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी, भागधारक व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजेश कराड यांनी केले.
कार्यक्रमास संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष बन्सीभाऊ भिसे, शेत रस्ता समिती सहअध्यक्ष सुरज शिंदे, भाजपा मंडल अध्यक्ष प्रताप पाटील, अॅड. मनोज कराड, चंद्रसेन लोंढे, गोपाळ पाटील, विजय काळे, विश्वास कावळे, शशिकांत पाटील, अमर शिंदे, डॉ. बाबासाहेब घुले, आदिनाथ मुळे, दीपक वांगसकर, बाबा भिसे, अशोक सावंत, अन्वर शेख, भैरवनाथ पिसाळ, श्रीमत नागरगोजे, शुभम खोसे, सचिन लटपटे, राजाभाऊ पवार, बाबासाहेब कदम, रामराव जाधव, सुधाकर कराड, शिवाजी नागरगोजे, अभिनव वायबसे, हनुमंत कतलाकुटे, बालाजी दुटाळ, अल्ताफ शेख, पांडुरंग गडदे, मदन कराड, विष्णु कराड, नारायण कराड यांच्यासह कारखान्याचे भागधारक, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis